कोल्हापूरात
पाहण्यासारखे म्हणजे साडेतीन पीठातील एक शक्तिपीठ महालक्ष्मी
मंदिर,दख्खनचा राजा जोतिबा मंदिर,श्रीक्षेत्र जोतिबा,दत्ताचे अवतार श्री
नृसिंह सरस्वती मंदिर,नृसिंहवाडी,शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन
असे खिद्रापूर मंदिर. ही मंदिरे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात
आहेत.कोल्हापूरची ओळख मराठ्यांची तिसरी राजधानी,छत्रपती राजर्षी शाहूंची
नगरी,मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर,कुस्तीची पंढरी,गुळाची आशियातील
सर्वात मोठी बाजारपेठ, विश्वप्रसिध्द कोल्हापूरी चप्पल,रंकाळा तलाव,इथला
रांगडा पण प्रेमळ माणूस आणि तांबडा-पांढरा रस्सा अशीही आहे.हे सर्व काही
पाहायचे,अनुभवायचे असेल तर कोल्हापूरला भेट दिली पाहिजे.सदर लेखात आपण
कोल्हापूरातील काही प्रसिध्द ठिकाणांची माहिती घेणार आहोत.
कोल्हापूरातील
महत्त्वाची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत;महालक्ष्मी मंदिर,भवानी मंदिर(भवानी
मंडप),रंकाळा तलाव,नवीन राजवाडा,पंचगंगा घाट,मांडरे चित्रदालन
राजारामपुरी,छत्रपती शिवाजी विद्यापीठ,शाहू खासबाग कुस्त्यांचे
मैदान,जोतिबा तीर्थक्षेत्र,किल्ले पन्हाळा,कणेरी मठ,श्रीक्षेत्र
नृसिंहवाडी,खिद्रापूरचे पुरातन मंदिर तसेच कोल्हापूरपासून जवळच गव्यासाठी
आरक्षित असलेले दाजीपूर अभयारण्य आणि भारतातील पहिले मातीचे धरण राधानगरी
येथे आहे.
श्री.महालक्ष्मी मंदिर
देवीच्या
साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी हे पुर्ण पीठ
आहे.श्री महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम प्राचीन असून चालुक्य,कदंब आणि
शिलाहार राजांच्या राजवटीत झालेले आहे.मंदिराचे बांधकाम हेमाडपंती
वास्तुशिल्प पद्धतीचे आहे.श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती
दगडी चौथऱ्यावर उभी आहे.अधिक माहिती धार्मिक स्थळांमध्ये वाचा.
श्री जोतिबा मंदिर
जोतिबाचे मुळ मंदिर हेमाडपंती शैलीतील असून,या ठिकाणी
आणखी तीन मंदिरे आहेत.मुख्य मंदिर हे प्राचीन असून त्याचे बांधकाम शिलाहार
राजाच्या कालखंडात झालेले असावे.उर्वरित दोन मंदिरे ही अठराव्या शतकात
ग्वाल्हेरचे शिंदे यांनी ते पुर्नचित करून भव्य स्वरूपात बांधली.अधिक
माहिती धार्मिक स्थळांमध्ये वाचा.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी
कृष्णा-पंचगंगेच्या
संगमावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी वसलेले आहे.श्री नृसिंहसरस्वती यांनी
नरसोबावाडी येथे बारा वर्ष तपश्चर्या करून आपल्या पादूका स्थापन
केल्यामुळे या स्थानास तपोभूमी असेही म्हणतात.कृष्णा नदीच्या तीरावर
औदुंबराच्या वृक्षाच्या छायेखाली श्री नृसिंहसरस्वती मंदिर आहे.मंदिरात
पादूकांच्या रूपात श्रीदत्तात्रेय भगवंतांचे वास्तव्य आहे.अधिक माहिती
धार्मिक स्थळांमध्ये वाचा.
श्री खिद्रापूर मंदिर,खिद्रापूर
खिद्रापूरचे
शिवमंदिर अत्यंत प्राचीन असून त्यांचे बांधकाम शिलाहार राजाच्या कालखंडात
झालेले आहे.मंदिर हेमाडपंथी प्रकारचे आहे.मंदिरात भगवान विष्णूची
(धोपेश्वर)मुर्ती आणि शिवलिंग आहे.मंदिराचे नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.
नरसोबावाडीपासून जवळच हे मंदिर आहे.कोल्हापूरला आला तर हे मंदिर पाहण्यास
विसरू नका.
किल्ले पन्हाळा
पन्हाळा
किल्ला प्राचीन कालापासून प्रसिध्द आहे.प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह
यांची पन्हाळा ही राजधानी होती.किल्ल्याचे बांधकाम भोज राजाच्या कालखंडात
झाले आहे.पन्हाळा किल्ला शिव छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या जीवनातील
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.महाराणी ताराराणीच्या करवीर,
कोल्हापूर संस्थानाची पन्हाळा ही राजधानी होती.अधिक माहिती किल्लेदुर्ग
मध्ये वाचा.
नवीन राजवाडा,कसबा बावडा
सदर
राजवाड्याचे बांधकाम सन १८७७-१८८४ या कालखंडात झालेले आहे.अत्यंत सुंदर व
देखणा असलेला हा राजवाडा पाहून मन हरवून जाते.नवीन राजवाड्यामध्ये आपण
वस्तूसंग्रहालय पाहू शकता.कोल्हापूरचे सध्याचे राजे शाहू छत्रपती यांचे हे
निवासस्थान आहे.कोल्हापूरच्या भेटीत चुकवता न येणारी अशी ही वास्तू आहे.
रंकाळा तलाव
कोल्हापूरात
आलेल्या पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव.महालक्ष्मी
मंदिरापासून जवळच असल्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी
असते.रंकाळ्याला भेट देण्यासाठी शक्यतो सायंकाळी निघावे,सुर्यास्ताचे वेळी
सुर्याचे तलावात पडणारे प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबात उजळणारा शालीनी
पॅलेस पाहावयास खूपच चांगला वाटतो.रंकाळ्यावर राजाभाऊची प्रसिध्द भेळ
मिळते.
भवानी मंडप
कोल्हापूरातील
गजबजलेले ठिकाण म्हणजे भवानी मंडप होय.महालक्ष्मी मंदिर तसेच भवानी मंदिर
या परिसरात असल्यामुळे पर्यटकांची येथे सदैव वर्दळ असते. भवानी मंडपातून
प्रवेश केल्यावर समोरच कुस्तीगिराचे शिल्प दिसते.या शिल्पाच्या खाली
कोल्हापूरातील प्रसिध्द खेळाडूंची नावे लिहिली आहेत.भवानी मंडपापासून जवळच
कुस्त्यांचे प्रसिध्द असे शाहू खासबाग मैदान आहे.कोल्हापूरच्या भेटीत
चुकवता न येणारे हे ठिकाण आहे.
कोल्हापूरी मिसळ
कोल्हापूरी
मिसळ खूपच प्रसिध्द आहे.पर्यटकांना सकाळच्या नाश्त्यासाठी मिसळचा पर्याय
सर्वात उत्तम.कोल्हापूरात उद्यमनगरातील फडतरे मिसळ,महाद्वार रोडवरील चोरगे
मिसळ तसेच कसबा बावड्यातील बावडा मिसळ प्रसिध्द आहे.कोल्हापूरी मिसळ
बनविण्याची पध्दत खाद्यसंस्कृती मध्ये पाहा.
कोल्हापूरी चप्पल
वापरायला
अत्यंत हलकी,सुटसुटीत पण दिसायला अत्यंत आकर्षक अशी कोल्हापूरी चप्पलची
ओळख आहे.चप्पलावरील नाजूक अशा नक्षीकामामुळे दिसायला खूपच सुंदर
वाटते.कोल्हापूरची आठवण म्हणून कोल्हापूरी चप्पल नेण्यास विसरू नका.
कोल्हापूरी मांसाहरी थाळी
कोल्हापूरात
आल्यानंतर तांबड्या व पांढर्या रश्याचा स्वाद न घेता जाणे म्हणजे
काहीतरी चुकल्यासारखे वाटेल.तांबडा-पांढरा रस्सा ही तर कोल्हापूरची खासीयत
आह.त्यामुळे अवश्य ही चव चाखा.तांबडा-पांढरा रस्सा बनविण्याची पध्दत
खाद्यसंस्कृती मध्ये पाहा.
कोल्हापूरी गुळ करण्याची पारंपारिक पध्दत
कोल्हापूरच्या
गुळाची चव जगभरात प्रसिध्द आहे.कोल्हापूरच्या मातीचा गोडवा जणू गुळात
उतरलेला आहे.गुळ करण्यासाठी ऊसाचा रस मशिनच्या साह्याने काढून तो मोठ्या
काहिलीमध्ये पंपाच्या साह्याने पाठविला जातो.
अंदाजे
तास-दीड तास तो रस उकळला जाते.रसामधील घाण निघून जाण्यासाठी तो एकसारखा
हलवत ठेवला जातो.त्यामध्ये चव येण्यासाठी भेंडीची पावडर टाकली जाते.जसा रस
घट्ट होत जातो त्यावेळी तो एका खोलगट,पसरट अशा जागी ओतून वेगवेगळ्या
भांड्यामध्ये भरला जातो.
भांड्याच्या
आकारमानानुसार एक किलो,पाच किलो तसेच दहा किलोचे रवे तयार होतात.गुळ तयार
करण्यार्या इसमास गुळव्या असे म्हटले जाते.गुळाचे रवे तयार झाल्यानंतर
ते विक्रीसाठी शहरात पाठविले जातात.शहरातील व्यापारी लोकांकडून गुळास
योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे तसेच उत्पादन खर्च वाढल्यामुळे गुळ तयार
करण्याचा हा पारंपारिक उद्योग बंद होण्याची भिती आहे.
No comments:
Post a Comment