महाराष्ट्राची संताची भूमि म्हणून ओळख आहे.बाराव्या शतकाच्या आरंभापासूनच महाराष्ट्रात सांस्कृतिक प्रबोधनाची लाट आली होती. जैन, नाथ, लिंगायत, महानुभव, वैष्णव, शैव आदि संप्रदायानी आपल्या धार्मिक कार्यामुळे समाज जीवनावर मोठा पगडा पाडला होता.या कालखंडात कला व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी ग्रंथनिर्मिती झाली.सदर संप्रदायातील संत मंडळी सर्वच जातिधर्मातील होती.महाराष्ट्रात वेगवेगळे संप्रदाय आहेत.प्रत्येक संप्रदायाचे आपले वेगळे वैशिष्ट्य आहे.
वैष्णव संप्रदाय
या प्रमुख अशा संप्रदायांत महानुभाव,वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आढळतात.
महानुभाव संप्रदाय
यादवांच्या कालखंडात महानुभाव हा लोकप्रिय पंथ होता.चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली.महानुभाव पंथाचे लोक कृष्णभक्त होते,कृष्णाचे पाच अवतार होते असे त्यांचे मत होते.या पंथांवर जैन व बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव होता.या पंथाचा प्रसार महाराष्ट्राबरोबर पंजाब व मध्य भारतात झाला.त्यांच्या सतिग्रंथ,साधना ग्रंथ,आख्यान काव्य, टीकाग्रंथ आदि ग्रंथाचे भारतीय तत्वज्ञानात मोठे य़ोगदान आहे.
वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाचा पंथ,हे लोक विठ्ठलाची पूजा करतात.संत ज्ञानेश्वर,संत नामदेवानी यांनी या पंथाचा पाया रचला आणि संत तुकारामांनी यावर कळस चढविला ,म्हणूनच म्हटले जाते.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस !
वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा पंथ आहे.वारकरी पंथातील संतानी मराठी भाषेत विपूल अशी ग्रंथसंपदा,काव्यसंपदा निर्माण केली आहे.या संप्रदायात सर्व जातिधर्माचे अनुयायी आहेत.वारकरी पंथाचे दैवत असलेले पंढरपुरचे विठ्ठल मंदिराच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी व मंदिर कोणी बांधले याविषयी वादविवाद आहेत.काहींच्या मते ते कर्नाटकच्या होयसाल राजाने बांधले,तर काहींच्या मते ते राष्ट्रकुट राजा अविधेयने बांधले आहे.वारकरी पंथाच्या संतानी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगातून प्रहार केले.संत चोखामेळा,संत ज्ञानेश्वर,संत सावता माळी,संत तुकाराम,संत एकनाथ,संत गोरा कुंभार आदि विविध जातिधर्मातील संतानी या पंथाचा प्रसार महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर केला.
- संत तुकाराम
- संत ज्ञानेश्वर
- संत एकनाथ
- संत नामदेव
- संत चोखामेळा
- संत गजानन महाराज
- संत गाडगेबाबा
- संत गोरा कुंभार
- संत सावता माळी
- संत साईबाबा
- संत रामदासस्वामी
- संत तुकडोजी महाराज
- संत सोयराबाई
रामदासी संप्रदाय
समर्थ रामदासानी या पंथाची स्थापना केली.रामाचे भक्त असलेल्या रामदासांनी महाराष्ट्रात हनुमानाची मंदिरे बांधली.बलोपासनासाठी त्यांनी व्यायामशाळा व मठ याची स्थापना केली.दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ त्यांनी लिहिले.
दत्त संप्रदाय
या पंथातील लोक दत्तात्रयाचे उपासक आहेत .गुरूभक्ती,पादुका पूजा या पंथात विशेष केली जाते.श्री क्षेत्र माहूर,औदुंबर,नरसोबाची वाडी व गाणगापूर(कर्नाटक) ही या पंथाची श्रध्दा स्थाने आहेत.
शक्तिपंथ
या पंथातील लोक देवी पार्वतीची उपासना करतात.या देवीची साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत.कोल्हापूरची महालक्ष्मीदेवी,तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणूकादेवी अशी ही तीन पूर्ण पीठे तर वणीची सप्तःशृंगी हे अर्धे पीठ आहे.
नाथ संप्रदाय
संत आदिनाथांनी स्थापन केलेला हा पंथ ,महाराष्ठ्रातील प्राचीन पंथ आहे.भगवान शिवाशंकराचे भक्त असलेले नाथ पंथीय योगविद्येतसुध्दा प्रवीण होते.संत नवनाथ,संत निवृतीनाथ,संत गहिनीनाथ याच पंथातील होते.या शैव संप्रदायाची श्रध्दास्थाने अष्ठविनायक,जेजूरीचा खंडोबा,नाशिकचा त्र्यंबकेश्वर आहेत.
No comments:
Post a Comment