• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संत सोयराबाई

    संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत.मंगळवेढ्याच्या हरिजनवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं पांडूरंगाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला,जातिव्यवस्थेत चोखामेळ्याच अख्ख कुटूंब भरडून गेले होते.संत चोखामेळा यांच्या पत्नी संत सोयराबाई,बहीण निर्मळा,मेहुणा बंका महार आणि मुलगा कर्ममेळा यांनी पददलितांचं जीवन जगलं.सोयराबाईचे एकूण ९२ अभंग उपलब्ध आहेत.बहुतांश अभंगांमधून ती स्वत:चा उल्लेख 'चोख्याची महारी'असा करते.चोखोबाची बायको असं अभिमानानं म्हणवून घेत असली तरी तिनं स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे.अत्यंत साधी,सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगाचे वैशिष्ठ होय.त्या काळी सवर्ण लोक शुद्राच्या सावलीचाही विटाळ मानीत असताना संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात व देवाला विचारतात,देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

     
    देहासी विटाळ म्हणती सकळ
    आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध
    देहीचा विटाळ देहीच जन्मला
    सोवळा तो झाला कवण धर्म
       
       Saint_Soyrabai    



    सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला,मारहाण केली,आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवलं गेलं.या भावना सोयराबाई खालीलप्रमाणे व्यक्त करतात.

    हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले
     
    परी म्या धरिले पदरी तुमच्या
     
    आता मोकलिता नव्हे नित बरी
     
    थोरा साजे थोरी थोरपणे

    विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या धर्ममार्तंडानी चोखोबाला कोंडून मारलं.कपडे फाडले,चामडी लोळवली.तरीही संत चोखाबा पायरीशी उभा राहून थेट विठोबाला 'जोहर मायबाप जोहार' म्हणत सवाल करत होता.सोयराबाईनेही विठ्ठलाला पुढीलप्रमाणे साकडे घातले आहे.

    आमची तो दशा विपरित झाली
     
    कोण आम्हा घाली पोटामध्ये
     
    आमचं पालन करील बा कोण
     
    तुजविण जाण दुजे आता

    देवाला कितीही भेटावंसं वाटलं तरी हरिजनांचे स्थान पायरीजवळ या गोष्टीचा राग येऊन सोयराबाई विठोबालाच रागावते.
    कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले ।
     
    आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि ।।
     
    घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे ।
     
    ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी ।।

    आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी संत सोयराबाई,नवऱ्याची वाट पाहते,अपत्यप्राप्ती साठी विठोबाला नवस बोलते व बाळाचा जन्म झाल्यावर बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण देते ,तिला खात्री होती की विदुराघरच्या कण्या आणि दौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान गोड मानणारा देव गावकुसाबाहेरच्या हरिजनाच्या घरी जेवेल.

    आमच्या कुळी नाही वो संतान तेणे वाटे शीण माझ्या मना..

    उपजता कर्ममळा वाचे विठ्ठल सावळा
     
    विठ्ठल नामाचा गजर वेगे धावे रुक्मिणीवर
     
    विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदानी

    चोखोबा आणि सोयराबाईंचा पुत्र कर्ममेळा हा पहिला विद्रोही कवी.आई बापाच्याही पुढे जात त्यांनी विठ्ठलाशी वाद घातला.

    आमुची केली हीन याती

    तुज का न कळे श्रीपती
     
    जन्म गेला उष्टे खाता
     
    लाज न ये तुमच्या चित्ता

    आयुष्यभर सोयराबाईच्या पदरी उपेक्षाच आली,अवहेलना,पराकोटीचं दारिद्य,पावलापावलावरचा अपमान,विटाळाच्या वास्तवाची होरपळ भेदाभेद हे सारं सोयराबाईनी अनुभवलं.अभंगातून ती आपल्या भावना पुढीलप्रमाणे व्यक्त करते.

    अवघा रंग एक झाला

    अवघा रंग एक झाला।
    रंगि रंगला श्रीरंग॥१॥

    मी तूंपण गेले वायां।
    पाहतां पंढरीच्या राया॥२॥

    नाही भेदाचें तें काम।
    पळोनि गेले क्रोध काम॥३॥

    देही असुनि तूं विदेही।
    सदा समाधिस्त पाही॥४॥

    पाहते पाहणें गेले दुरी ।
    म्हणे चोख्याची महारी॥५॥


    No comments:

    Post a Comment