संत
सावता माळीचा जन्म इ.स. १२५० साली पंढरपूरजवळच्या अरणभेंडी या गावी
झाला.त्यांच्या वडीलांचे नाव परसूबा तर आईचे नाव नांगिताबाई होते.त्यांचे
आई व वडील दोघेही विठ्ठल भक्त होते.सावता हा त्यांना नवसाने झालेला मुलगा
होता.संत सावता माळी जातीने माळी समाजातील होते.लहानपणापासून सावता
शेतामध्ये काम करताना विठ्ठलभक्तीमध्ये रमून जाई.त्यांच्या अभंगात
तत्कालीन सामाजिक संदर्भाचे दर्शन घडते. सावताने आपले आध्यात्मिक अनुभव
प्रकट करतांना व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द याचा अभंगात वापर केलेला
आढळतो .‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा
अनुभव होता.अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५)
रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले.
संत
सावता माळ्याचे २५ अभंग उपलब्ध आहेत.आपल्या ऐहिक जीवनातील कर्तव्येकर्मे
पार पाडून ईश्वरभक्ती करता येते व तो सर्वांचा अधिकार आहे असे त्यांचे मत
होते.आपल्या अभंगातून त्यांनी धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य
केले.संत सावता हे संत ज्ञानदेव,संत नामदेव यांचे समकालीन होते.संत सावता
कधीही पंढरपूरला गेले नाहीत तर प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास
येत.कर्ममार्गी संत असलेल्या संत सावताची ‘कर्मे ईशु भजावा’ हीच वृत्ती
होती.
|
|
माळियाचे वंशी, सांवता जन्मला | पावन तो केला | वंश त्याचा ||
त्याजसवें हरी, खुरपूं लागे अंगी | धांवूनि त्याच्यामागें | काम करी ||
पीतांबर कास, खोवोनी माघारी| सर्व काम करी | निज अंगे ||
एका जनार्दनीं, सांवता तो धन्य| तयाचें महिमान | न कळें कांही ||
कर्तव्य आणि कर्म हीच खरी ईश्वरसेवा असे संत सावताचे मत होते. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे.
'कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी|
लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ||
ऊस गाजर रताळू | अवघा झालासे गोपाळू|
मोट नाडा विहीर दोरी | अवघी व्यापिली पंढरी |
सांवता म्हणे केला मळा | विठ्ठल पार्यी गोविला गळा ||
काम
करताना ते नेहमी सावळ्या विठ्ठलाचे ध्यान धरीत,एकदा त्यांना भेटावयास
त्यांचे सासरवाडीचे लोक आले असता ,विठ्ठल भक्ती दंग असलेल्या सावताचे
त्यांच्या कडे दुर्लक्ष झाले ,तेव्हा त्यांची पत्नी संतापली असता त्यांनी
तिला पुढीलप्रमाणे उपदेश केला.
प्रपंचीं असूनि परमार्थ साधावा | वाचे आठवावा पांडुरंग |
उंच नीच कांही न पाहे सर्वथा | पुराणींच्या कथा पुराणींच ||
घटका आणि पळ साधीं उतावीळ | वाडगा तो काळ जाऊं नेदी |
सावता म्हणे कांते जपें नामावळी | हृदयकमळीं पांडुरंग ||
ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप याची बिलकूल आवश्यकता नाही,असे सावताचे मत होते.
योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।
विठ्ठलाचा
वावर सर्वत्र आहे.सावता आपल्या शेतात उगवलेल्या चैतन्याच्या कोंभात
सुध्दा विठ्ठलाचे गोंडस रुप पाहत होता.'सावताने केला मळा | विठ्ठल देखियला
डोळा' असे शेवटी सावता म्हणतो.
स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।
सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।।
No comments:
Post a Comment