जंजिरा किल्ल्याला शिड्या उभारणारा दर्यावीर लायजी पाटील
शिवरायांना
कोकणात अनेक नररत्ने मिळाली.लायजी पाटील कोळी हे त्यापैकीच एक होत.अनेक
कोळी बांधव शिवरायांच्या सैन्यात होते. आगरी, भंडारी, गावित, कोळी आदि
कोकणातील मंडळी गलबते बांधण्यात पटाईत होती.संगमिरी हा गलबतातील नवीन
युध्दप्रकार याच मावळ्यांनी आणला.
जंजिरा
किल्ला हा कोकणातील सिध्दीचा गड,अनेक प्रयत्न करूनसुध्दा हा किल्ला
मराठ्यांच्या हातात लागत नव्हता.छत्रपतींनी मोरोपंत पिंगळे वर या मोहिमेची
जबाबदारी सोपविली.मोरोपंत घाटातील हशम(मावळे)घेऊन मुरूडला दाखल
झाले.जंजिरावर हल्ला कसा करावयाचा याचा आराखडा आखत असताना लायजी पाटीलने
जंजिरा किल्ल्याच्या तटाला समुद्रातून शिड्या लावण्याचा विचार सांगितला व
स्वत:ही जबाबदारी अंगावर घेतली.मध्यरात्री छोट्या होड्यातून मावळ्यांना
गडाच्या तटापर्यंत पोहोचवावे आणि मग शिड्यांच्या साह्याने गडावर चढून आतील
हबश्यांचा बंदोबस्त करावा असे ठरले.
किल्ल्यावरील
हबशांना थोडी जरी चाहूल लागली तरी सर्व मराठी मावळे मारले जाणार
होते.लायजीने मोरोपंतास सांगितले आम्ही शिड्या लावतो,तुम्ही पाठोपाठ
येणे.मध्यरात्री अंधारात वल्ह्यांचा आवाज न करता लायजीच्या होड्या
जंजिराच्या तटाकडे निघाल्या.तटाजवळ पोहचल्यानंतर लायजीने व साथीदारांनी
शिड्या तटावर लावल्या व ते मोरोपंताची वाट पाहू लागले.बराच वेळ निघून गेला
प्रभात होण्याची वेळ आली तरी मोरोपंताच्या होड्या दिसेनात.शेवटी सिध्दीला
आपला डाव कळेल म्हणून लायजीने हताश होऊन शिड्या काढण्याचा निर्णय घेतला व
तो माघारी परतला.लायजी कोळ्याचा पराक्रम वाया गेला व जंजिरा जिंकण्याची
एक सुवर्णसंधी मराठ्यांनी गमावली.पुढे संभाजीराजेंनी राजापुरीच्या खाडीत
भराव टाकून किल्ल्यावर हल्ला केला.पण त्याच सुमारास औरंगजेबने दक्षिणेस
आघाडी उघडल्याने हाती आलेला विजय संभाजीराजेंनी सोडून द्यावा लागला व
किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.
जंजिरा किल्ला:दर्यावीर लायजी पाटील कोळीच्या पराक्रमाचा साक्षीदार
No comments:
Post a Comment